Mahayuti Clash | कोकणात भगव्या शालीवरून महायुतीत ठिणगी – राणे विरुद्ध सामंत संघर्ष तीव्र
कोकणात नितेश राणे विरुद्ध उदय सामंत वाद पुन्हा पेटला. रायगड व ठाण्यातही महायुतीत संघर्ष वाढला. कोकणवासीयांचा सवाल – मूलभूत प्रश्न केव्हा सुटणार?
Kokan Politics | कोकणात पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. वर्चस्वाच्या राजकारणातून सुरुवात झालेला हा संघर्ष आता भगव्या शालीवरून रंगला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात शालप्रकरणावरून जोरदार शब्दयुद्ध झालं.
प्रत्यक्षात, राणे विरुद्ध सामंत हा कोकणातील पारंपरिक संघर्ष मानला जातो. मात्र महायुतीत एकत्र काम करताना तडजोडी अपरिहार्य ठरत आहेत. गणेशोत्सवात उदय सामंतांनी नितेश राणेंना डिवचलं होतं, त्यावर राणेंनीही तिखट प्रतिक्रिया दिली. हा वाद शमल्याचं वाटत असतानाच 11 सप्टेंबरला नितेश राणेंनी सामंतांच्या रंगीबेरंगी मफलरवरून पुन्हा टोला लगावला.
तसंच, महायुतीतील वाद फक्त रत्नागिरीपुरता मर्यादित नाही. रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Shet Gogawale) यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर ठाण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. ठाणे महापालिकेत विजय मिळवण्याचा नाईकांचा निर्धार स्पष्टपणे दिसतोय.
युतीतील नाराजीमुळे डीपीडीसी निधीच्या वाटपावरून निलेश राणे विरुद्ध उदय सामंत यांच्यातही धुसफूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रालयापासून कोकण-ठाण्यापर्यंत महायुतीतील संघर्ष तीव्र झाल्याचं चित्र आहे.